कल्याणमध्ये तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचे कंबरडे मोडले. भारतीय सैन्याच्या या शूर पराक्रमाच्या सन्मानार्थ शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेतर्फे कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला कल्याणकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आपल्या भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. या ऑपरेशनदरम्यान भारतमातेच्या वीरपुत्रांनी दाखविलेल्या शौर्य, संयम आणि बलिदानाच्या सन्मानार्थ ही तिरंगा रॅली संपन्न झाली.
आम्ही सर्व देशबांधव ऑपरेशन सिंदूर सोबत आहोत हे दर्शवण्यासाठी कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वात कल्याण पश्चिम येथे तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती.
ही बाईक रॅली कल्याण शहरामध्ये किल्ले दुर्गाडी मंदिर दुर्गादेवीची आरती करून पुढे आधारवाडी- खडकपाडा- भवानी चौक- कल्याण स्टेशन दिपक हॉटेल- हॉटेल पुष्पराज- छत्रपती शिवाजी महाराज चौक-शंकराव चौक-गांधी चौक- पारनाका- लालचौकी- आग्रा रोड- छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाली. यावेळी भारत माता की जय आणि भारतीय सैन्याचा विजय असो अशी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
या रॅलीमध्ये विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर, उपशहर प्रमुख सुनील वायले, माजी नगरसेवक जयवंत भोईर, गणेश जाधव, उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, युवासेना शहर प्रमुख सुजित रोकडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक तसेच असंख्य देशप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.


