राष्ट्रीय लोकन्यायालय अदालत १० मे रोजी कल्याण न्यायालयात - नागरिकांनी सहभाग घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
कलम भूमी. कल्याण प्रतिनिधी
मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन शनिवारी १० मे २०२५ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, कल्याण येथे करण्यात आले आहे. या लोकन्यायालयात लोक अदालतात एकूण ११,४२५ प्रिलीटीगेशन दावा दाखल पूर्व प्रकरणाचा समावेश असून, संबंधित पक्षकारांना न्यायालयाच्या शिक्यासह नोटीसा पाठविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रभाग निहाय कर्मचाऱ्यामार्फत नोटीसा वितरित केल्या जात आहेत. न्यायालयात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित अपेक्षित असल्यामुळे न्यायालय परिसरात विशेष मंडप उभारण्यात आला आहे
सोबतच प्रभागनिहाय आसन व्यवस्था , टेबल खुर्च्या, पंखे,संगणकीय सुविधा आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलीस बंदोबस्त यांचेही तयारी प्रशासनाने केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने थकीत मालमत्ता कर असलेल्या नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन प्रकरणे सौहार्दाने निकाली काढावीत, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. नागरिकांनी न्यायालयीन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पुढाकार घ्यावा व विकासात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे.

