कल्याण काँग्रेसला नवे बळ; संघटन सृजन अभियानातून नवीन नेतृत्वाची चाहूल
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
कल्याण : काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देत संघटन अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत असल्याचे संकेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक पलक वर्मा यांनी दिले. कल्याण येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाच्या नव्या बांधणीची रूपरेषा स्पष्ट करताना सांगितले की, देशभर सुरू असलेल्या “संघटन सृजन अभियान (महाराष्ट्र)” अंतर्गत काँग्रेसला पुन्हा सक्षम आणि प्रभावी बनवण्यावर भर दिला जात आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची प्रतिमा उंचावणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना पलक वर्मा यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्टपणे मान्य केले. मात्र, आता नव्या धोरणांद्वारे ही परिस्थिती बदलून पक्षाला एकसंध आणि सशक्त बनवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. विशेषतः तरुण आणि उत्साही कार्यकर्त्यांना संधी देऊन नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याचा निर्णय पक्षासाठी टर्निंग पॉईंट ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याण येथील पाल्म वॉटर रिसॉर्टमध्ये झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यात आला. त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचना जाणून घेत पक्ष संघटना अधिक परिणामकारक करण्यावर भर देण्यात आला.
या प्रसंगी कल्याण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजा भाऊ पातकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव ब्रिज दत्त, निरीक्षक तुकाराम रेंगे पाटील, राणी अग्रवाल, शाआलम शेख, मुन्ना तिवारी, गोपाल शर्मा, इफ्टिंखार खान, योगेश कुलकर्णी, आजम शेख, नवीन सिंग, अवी दीक्षित यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
एकंदरीत, संघटन सृजन अभियानच्या माध्यमातून कल्याण काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, पक्षाला नवसंजीवनी मिळून आगामी काळात संघटन अधिक भक्कम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


