काँग्रेसचा जल्लोष; केरळ विजयाने देशभरात नवचैतन्य, भाजपला धक्का
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
केरळ राज्यातील निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर कल्याण येथील काँग्रेस कार्यालयात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत पेढे वाटप, केक कापून आणि जोरदार घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला.
कल्याण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी या विजयाबद्दल बोलताना सांगितले की, केरळमधील यश हे केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवसंजीवनी मिळत आहे.
कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी “काँग्रेस जिंदाबाद” अशा घोषणा देत वातावरण दणाणून सोडले. जेष्ठ नेते मामा पगारे, मिलोय देवासिया, विनोद पिल्ले, सैजू, संदीप भाबड आणि सब्बीर शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विजयामुळे भारतीय राजकारणात नवा संदेश गेला असून भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस नेत्यांच्या मते, केरळमधील यश हे केंद्र सरकारच्या धोरणांविरोधातील जनतेच्या नाराजीचे प्रतीक आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष यामुळे मतदारांनी पर्याय म्हणून काँग्रेसला पसंती दिल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
पुढील काळात काँग्रेस पक्ष देशभरात संघटन मजबूत करत जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले. “केरळचा विजय हा फक्त सुरुवात आहे, आगामी निवडणुकांमध्ये देशभरात काँग्रेसची लाट दिसेल,” असा विश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला.
एकूणच, केरळमधील विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, येणाऱ्या राजकीय समीकरणांमध्ये या निकालाचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
