केडीएमसीच्या विद्युत विभागाकडून जुन्या धोकादायक पोलची बदली; पावसाळ्यापूर्वी उपाययोजना पूर्ण
कलम भूमिका, कल्याण : प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून शहरातील धोकादायक व जीर्ण झालेल्या विद्युत पोलची मोठ्या प्रमाणावर बदली करण्यात येत असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध भागांमध्ये तपासणी करून आतापर्यंत २६८ धोकादायक पोल बदलण्यात आले आहेत.
महापालिका क्षेत्रात दिवाबत्ती सेवा कार्यान्वित ठेवण्यासाठी एकूण 33 हजार ८७० पथदिवे पोल व 41907 हजार लाईट बसविण्यात आले आहेत. याशिवाय महापालिकेच्या प्रशासकीय इमारती, दवाखाने, हॉस्पिटल, आरोग्य केंद्रे व इतर शासकीय कार्यालयांमध्ये विविध क्षमतेची वायरिंग व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा, विद्युत जनरेटर, ट्रान्सफॉर्मर आदी उपकरणे कार्यरत असून त्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती केली जात असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वी विद्युत यंत्रणेची व्यापक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. फेब्रुवारी २०२६ पासून विविध विभागांमध्ये पाहणी, तपासणी आणि दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली. या तपासणीत १० प्रभागांमधील एकूण 268 गंजलेले, खराब व जीर्ण झालेले पथदिवे पोल आढळून आले होते. त्यापैकी 198 पोलची बदली पूर्ण करण्यात आली असून उर्वरित कामेही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
तसेच १८९ नादुरुस्त फिटिंग ब्रॅकेट आणि १२ वितरण नियंत्रण पॅनल बदलण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. वायरलेस यंत्रणेची तपासणी करून ती सुरळीतपणे कार्यरत ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींना तोंड देणे अधिक सोपे होणार असल्याचे सांगण्यात आले.
महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार विविध प्रशासकीय कार्यालये, रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे आणि इतर सार्वजनिक ठिकाणांवरील विद्युत यंत्रणेची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देता यावा यासाठी विद्युत विभागाचा ‘कम्युनिकेशन प्लॅन’ देखील सक्षम करण्यात आला आहे.
पावसाळ्यादरम्यान विद्युत विषयक दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे कार्यकारी अभियंता (विद्युत) जितेंद्र बी. शिंदे यांनी सांगितले.

