केडीएमसीत ४९० पदांच्या भरतीसाठी सप्टेंबरमध्ये परीक्षा
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (केडीएमसी) विविध विभागांतील ४९० रिक्त पदांच्या भरतीसाठी सप्टेंबर महिन्यात लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी आतापर्यंत ५० हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. परीक्षा ९ ते १२ सप्टेंबर या कालावधीत टीसीएस या संस्थेमार्फत होणार असून, वेळापत्रक, प्रवेशपत्र आणि परीक्षा केंद्रांची माहिती लवकरच केडीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
भरतीची पार्श्वभूमी
महानगरपालिकेत जवळपास तीन दशकांनंतर एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया होत आहे. यापूर्वी १५०० पदांची भरती झाली होती. यंदा सुरुवातीला १००० हून अधिक पदे भरण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, आयुक्तांच्या निर्देशानुसार केवळ आवश्यक पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अखेर ४९० पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.
जाहिरातींनुसार उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जुलै निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर इच्छुकांच्या सोयीसाठी मुदत आणखी १५ दिवसांनी वाढविण्यात आली.
परीक्षेचे स्वरूप
परीक्षेत इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा समावेश असेल. अभ्यासक्रम आधीच महानगरपालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
प्रशासनाची माहिती
महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उप आयुक्त वंदना गुळवे यांनी सांगितले की, “लेखी परीक्षा ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार असून, या परीक्षा टीसीएसमार्फत घेतल्या जातील.


