शासन-निवडणूक आयोगाचा बेकायदेशीर कारभार – नागरिकांशी सरळ प्रतारणा,
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली प्रभाग रचना ही नियमांना हरताळ फासणारी व नागरिकांचा विश्वासघात करणारी ठरली आहे. निवडणूक आयोगाकडून या प्रक्रियेत प्रचंड हलगर्जीपणा झाला असून, शासनाने देखील याकडे मुद्दाम डोळेझाक केली आहे.
नियमाप्रमाणे प्रभाग रचना टीटवाळा (पूर्व) पासून सुरू होणे बंधनकारक होते, परंतु निवडणूक विभागाने नियम पायदळी तुडवत उलट दिशेने रचना सुरू केली. हा निर्णय म्हणजे सुस्पष्ट शासकीय बेफिकिरीचा नमुना आहे. नागरिकांच्या हक्कांवर गदा आणून शासनाने जनतेला फसवले आहे.
इतकेच नव्हे तर, प्रभाग रचनेतून वाहतूक, रस्ते, नाले, पूल यासारख्या मूलभूत सोयी-सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी भविष्यात प्रचंड वाहतूक कोंडी, गोंधळ व नागरीकांची गैरसोय होणार यात शंका नाही. शासनाच्या अशा निष्काळजी धोरणामुळे जनता प्रचंड संतापली असून, “नियम फक्त जनतेसाठी आणि अपवाद शासकीय अधिकाऱ्यांसाठीच का?” असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
रामबाग, अशोक नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, वाळधूनी परिसरातील रचनेत प्रचंड विसंगती आढळत असून, लोकांच्या जीवन-मरणाशी खेळणारी ही गैरजबाबदार प्रशासनाची उघडीकीस आलेली कारभारशैली आहे.
आजवर शासनाने कित्येकदा ‘नागरिकांची सुरक्षितता, सुविधा व नियमांची अंमलबजावणी’ याची ग्वाही दिली. पण प्रत्यक्षात मात्र नियम पाळले जात नाहीत, उलट नियम मोडून प्रभाग रचना केली जाते. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया “शासन-निवडणूक आयोगाची संगनमताने केलेली जनतेविरोधी खेळी” असल्याचा संशय नागरिकांमध्ये पक्का झाला आहे.

