20 वर्षांपासून रखडलेला
आर.टी.जी. शिवसृष्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचे निर्धार – माजी आमदार नरेंद्र पवार यांची हमी
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण पश्चिमेच्या आग्रा रोड परिसरातील गेल्या दोन दशकांपासून रखडलेला आर.टी.जी. शिवसृष्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण कोणतीही किंमत मोजून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे. “हा प्रकल्प आता आणखी थांबणार नाही, तो मार्गी लागलाच पाहिजे”, अशा ठाम शब्दांत त्यांनी सभासदांना आश्वस्त केले.
या प्रकल्पाच्या पुनर्विकासासाठी मूळ जागामालक देशमुख कुटुंबातील हावेश देशमुख यांनी साई बाबा डेव्हलपर्स यांना काम दिले होते. परंतु साई बाबा डेव्हलपर्स आणि आर.टी.जी. इन्फ्रा या विकासक कंपन्यांतील वादामुळे गेल्या 20 वर्षांपासून 52 ते 53 कुटुंबांना घराच्या न्यायापासून वंचित राहावे लागले आहे. या प्रदीर्घ काळात पाच जणांचा मृत्यू झाला, आणि उर्वरित सभासद आजही न्यायासाठी दरवाजे ठोठावत आहेत. ही बाब बैठकीत रहिवाशांनी उघड केली.
सभासदांचे हाल ऐकून घेतल्यानंतर नरेंद्र पवार यांनी ठामपणे सांगितले की, “हा प्रकल्प आपण नक्की मार्गी लावू शकतो आणि त्यासाठी मी स्वतः पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन. या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी तीन आठवड्यांचा अवधी लागेल आणि त्यानंतर पुढील बैठक घेऊन ठोस भूमिका मांडली जाईल.”
या बैठकीस प्रकल्पातील सुमारे 30 सभासद प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या अपेक्षांना प्रतिसाद देताना पवार यांनी स्पष्ट केले की, कल्याणमधील रखडलेल्या प्रकल्पांना गती देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे
. यापूर्वी चिकणघर येथील शांतीदूत गृहनिर्माण सोसायटी आणि एलआयजी 1 च्या पुनर्विकास प्रकरणीही ते शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रहिवाशांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने आता नवी आशा निर्माण झाली असून, पवार यांच्या हस्तक्षेपामुळे शिवसृष्टी प्रकल्प मार्गी लागण्याची लढाई निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे.


