प्रसूतीनंतर नवजात शिशूचा मृत्यू; नातलगांचा हलगर्जीपणाचा आरोप, महापालिकेला अमान्य
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वसंत वेली प्रसूतीगृहात एका प्रसूतीनंतर नवजात शिशूचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मृत शिशूच्या नातलगांनी डॉक्टर व रुग्णालय कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप केला असला तरी महानगरपालिकेने हे आरोप फेटाळले आहेत. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.२० वाजता वसंत वेली प्रसूतीगृहात श्रीमती तसलीम अशरफली मन्सुरी (वय २७) यांना प्रसूती झाली. त्यातून २.८ किलो वजनाचे बाळ जन्माला आले. मात्र जन्मानंतर बाळाने श्वास घेतला नाही. त्वरित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तपासणी करून उपचार सुरू केले.
बालरोगतज्ज्ञांच्या तपासणीत बाळाची श्वसनसंस्था व्यवस्थित कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर Gastric Lavage करण्यात आला आणि बाळाला ऑक्सिजन देण्यात आला. तरीदेखील बाळाची प्रकृती गंभीरच राहिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ वाजता बाळाची प्रकृती अचानक खालावली. ऑन-ड्युटी स्टाफने तत्काळ डॉक्टरांना बोलावले. मात्र तपासणीअंती हृदयाचे ठोके मंदावलेले व श्वासोच्छ्वास थांबलेला आढळला. डॉक्टरांनी प्रयत्न केले तरी सकाळी ६.४० वाजता बाळाला मृत घोषित करण्यात आले.
या घटनेनंतर नातलगांनी डॉक्टर व नर्सिंग स्टाफवर हलगर्जीपणाचा आरोप केला. मात्र महापालिकेने हे आरोप फेटाळले असून, जन्मानंतर बाळाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यानेच हा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदनाचा अहवाल येणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले
