उल्हासनगरात मठाच्या जायदादीवरून रक्तरंजित हल्ला
वसंतशाह दरबारातील वर्चस्वाच्या वादातून चुलत भावाकडून प्राणघातक हल्ल्याचा आरोप
१३ आरोपींविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल
कलम भूमी,उल्हासनगर प्रतिनिधी
शहरातील नागरिकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या वसंतशाह दरबार येथील मौल्यवान जायदादीवर ताबा मिळवण्यासाठी झालेल्या वादातून थेट प्राणघातक हल्ल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात १३ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प क्रमांक ५ येथील वसंतशाह दरबारात वास्तव्यास असलेले हीरानंद जग्यासी हे दरबारात सेवा देण्यासोबतच मेडिकल स्टोअरही चालवतात. याच दरबारातील जायदादीवरून त्यांचा भाचा कमलेश जग्यासी याच्यासोबत दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. भाच्याने वारंवार जायदादीवरील हक्क सोडण्याचा दबाव टाकल्याने चाचा-भाच्यामध्ये सतत तणाव निर्माण होत होता.
दिनांक २९ जानेवारी रोजी रात्री, हीरानंद जग्यासी हे आपल्या सेवादार राजेश कारीरा यांच्यासह दरबारात उपस्थित असताना, पूर्वनियोजित कट रचून
किसन गंगवाणी, अनिल गंगवाणी, आयुष गंगवाणी, लखमीचंद गंगवाणी, विपेश गंगवाणी, सुनील दावडा, रवि दामेजानी, अक्षय राजानी, मोहित वालेचा, हरेश रोहरा, नरेश रोहरा, गुलराज छतीजा आणि दीपक गोपलानी
या १३ जणांनी घातक शस्त्रांसह दरबारात घुसखोरी करत हीरानंद जग्यासी व त्यांच्या सेवादारावर बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हीरानंद जग्यासी यांनी त्याच रात्री हिल लाईन पोलीस ठाण्यात तात्काळ तोंडी तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही जखमींना शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर शुक्रवारी संबंधित सर्व आरोपींविरोधात प्राणघातक हल्ला, बेकायदेशीर जमाव, कट रचना व शस्त्रास्त्र वापर अशा गंभीर कलमान्वये अधिकृत प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमागे केवळ कौटुंबिक वाद नसून, वसंतशाह दरबारावर वर्चस्व मिळवण्याची सुनियोजित लढाई असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. श्रद्धास्थानाला गुन्हेगारी वर्चस्वाच्या संघर्षात ओढल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, हिल लाईन पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, आरोपींच्या अटकेची प्रक्रिया लवकरच राबवली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
शहरातील श्रद्धास्थानांची सुरक्षा व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.