भिकू बारस्कर यांच्या साहित्यसेवेचा गौरव; कार्याचा सन्मान म्हणून कार्यकारिणीवर निवड
कलम भूमी प्रतिनिधी ,कल्याण
कल्याण : साहित्य क्षेत्रात सातत्याने आणि निष्ठेने कार्य करणारे कथाकार भिकू बारस्कर यांच्या कार्याचा योग्य तो सन्मान करत त्यांची विविध प्रतिष्ठित साहित्य संस्थांच्या कार्यकारिणी मंडळावर जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड म्हणजे त्यांच्या अनेक वर्षांच्या परिश्रमांचे आणि साहित्यसेवेचे मिळालेले योग्य फळ असल्याची भावना साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.
ठाणे जिल्हा ग्रंथालय संघ, कोकण विभाग ग्रंथालय संघ तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे (मध्यवर्ती शाखा) या नामांकित संस्थांच्या कार्यकारिणीवर त्यांची निवड होणे हे त्यांच्या कार्याचा गौरव मानले जात आहे. वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, तसेच लेखक आणि वाचक यांना जोडणारा दुवा म्हणून निभावलेली भूमिका यामुळे त्यांना ही संधी मिळाली आहे.
सार्वजनिक वाचनालय, कल्याणचे सरचिटणीस म्हणून कार्य करताना त्यांनी १०० वर्षे जुनी वाचनालये जतन व्हावीत, त्यांचा सन्मान व्हावा यासाठी सातत्याने आवाज उठवला. साहित्य संमेलनातून त्यांनी मांडलेली भूमिका आणि वाचनालयांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न हे त्यांच्या बांधिलकीचे प्रतीक ठरले आहेत.
कथाकार म्हणूनही त्यांनी सामाजिक वास्तव आणि मानवी नात्यांवर आधारित लेखन करत वाचकांना विचारप्रवृत्त केले आहे. त्यांच्या साहित्यिक कार्यामुळे समाजात जागरूकता निर्माण झाली असून, त्यांच्या लेखणीला वाचकांकडून विशेष प्रतिसाद मिळत आहे.
या सर्व कार्याचा परिपाक म्हणूनच त्यांची कार्यकारिणीवर निवड झाली असून, ही निवड म्हणजे त्यांच्या कष्टाचे बक्षीस असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे साहित्य परिषदेत नवचैतन्य येईल आणि जिल्हा स्तरावर वाचनसंस्कृतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
स्थानिक साहित्यिक, वाचनप्रेमी आणि विविध स्तरांतील मान्यवरांकडून त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
