डोंबिवलीत ‘जनसंवाद’मधून नागरिकांशी थेट संवाद; विकासाच्या प्रश्नांवर रविंद्र चव्हाण यांची तातडीची दखल
" माझं घर, डोंबिवलीकर माझं कुटुंब" – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
कल्याण : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे रविंद्र चव्हाण यांनी रविवारी डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमातून नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध नागरी समस्या जाणून घेतल्या. नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचा विश्वास देत त्यांनी "डोंबिवली माझं घर आहे आणि येथील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे हे माझे कर्तव्य आहे," अशी भावना व्यक्त केली.
या जनसंवाद कार्यक्रमाला डोंबिवलीतील विविध भागांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाणीपुरवठ्याच्या समस्या, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतेचे प्रश्न, वाहतूक कोंडी, जलनिस्सारण, सार्वजनिक सुविधा, वीजपुरवठा तसेच इतर स्थानिक प्रश्न नागरिकांनी थेट रविंद्र चव्हाण यांच्यासमोर मांडले. प्रत्येक नागरिकाचे म्हणणे संयमाने आणि लक्षपूर्वक ऐकून घेत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या अडचणी समजून घेणे, त्यांचे वेळेत निराकरण करणे आणि विकासकामांना गती देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. जनतेने दाखविलेला विश्वास हीच आपली खरी ताकद असून तो विश्वास कायम राखण्यासाठी प्रत्येक प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
डोंबिवली आणि कल्याण परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रविंद्र चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षांत सातत्याने पाठपुरावा केला आहे. रस्ते, उड्डाणपूल, रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, वाहतूक व्यवस्था, जलनिस्सारण, सार्वजनिक पायाभूत सुविधा तसेच विविध विकासकामांसाठी त्यांनी शासन स्तरावर प्रभावी भूमिका बजावत निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याची त्यांची कार्यपद्धती नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरत असल्याची भावना अनेक उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला भाजपचे स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अनेक नागरिकांनी आपल्या समस्या प्रत्यक्ष मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच अशा प्रकारचे ‘जनसंवाद’ उपक्रम नियमितपणे आयोजित करून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
जनसंवादाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रत्यक्ष पुढाकार घेण्याची रविंद्र चव्हाण यांची कार्यशैली पुन्हा एकदा अधोरेखित झाली. नागरिकांच्या सहभागातून विकासाला गती देण्याचा हा उपक्रम डोंबिवलीतील लोकशाही संवाद अधिक सक्षम करणारा ठरत असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
