टिटवाळा–बल्ल्याणी रस्ता खचल्या
टिटवाळा–बल्ल्याणी रस्ता खचल्याने केडीएमसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; जनतेच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचा आरोप
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : टिटवाळा–बल्ल्याणी मार्गावरील रस्ता खचल्याच्या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या खुलाशातूनच संबंधित पाईप कल्व्हर्ट तांत्रिकदृष्ट्या दोषपूर्ण असल्याची माहिती दोन वर्षांपासून प्रशासनाला होती, तसेच संबंधित प्राधिकरण आणि कंत्राटदाराकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, हे समोर आले आहे. त्यामुळे या दुर्लक्षाची किंमत आता नागरिकांना मोजावी लागल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, बडोदा एक्सप्रेस वेच्या कामादरम्यान नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून नवीन पाईप कल्व्हर्ट उभारण्यात आला होता. मात्र, हा कल्व्हर्ट तांत्रिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे अभियंते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाहणीत स्पष्ट झाले होते. तरीही दोषपूर्ण काम करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात आली नाही किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली नाही.
दरम्यान, मुसळधार पावसात कल्व्हर्ट दुभंगल्याने टिटवाळा आणि बल्ल्याणी परिसरातील संपर्क तुटला. वाहतूक अनेक तास ठप्प झाली. त्यानंतर महापालिकेला तातडीने तात्पुरता पाईप कल्व्हर्ट उभारून रस्ता सुरू करावा लागला. त्यामुळे सुरुवातीला करण्यात आलेल्या निकृष्ट कामाचा आणि त्यानंतरच्या तात्पुरत्या दुरुस्तीचा खर्च अखेर जनतेच्या कररूपी पैशातूनच होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नागरिकांच्या मते, जर महापालिकेला दोन वर्षांपूर्वीच कल्व्हर्ट दोषपूर्ण असल्याची माहिती होती, तर कायमस्वरूपी आरसीसी संरचना उभारण्यासाठी संबंधित प्राधिकरणावर प्रभावी कारवाई का करण्यात आली नाही? केवळ पत्रव्यवहार करून प्रशासनाची जबाबदारी संपते का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
या घटनेमुळे विकासकामांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका होत असून, दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
टिटवाळा–बल्ल्याणी रस्ता खचल्याची घटना ही केवळ पावसामुळे घडलेली दुर्घटना नसून, नियोजनाचा अभाव, निकृष्ट दर्जाची कामे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे उदाहरण असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करावी, अशी मागणी काँग्रेस गट नेत्या कांचन ताई कुलकर्णी यांनी जनतेच्या बाजूने मागणी केली असून नागरिकांच्या सुरक्षाची काळजी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
